Wednesday, January 9, 2013

* आमचे आरोग्य - परिस्थितीच्या चक्रात *

 *   आमचे आरोग्य - परिस्थितीच्या चक्रात   *

    समतोल व संयमीत मन ज्या व्यक्तिजवळ आहे तिचे आरोग्य चांगले आहे असे ठोकळमानाने म्हणता येईल पण खरोखर इतके उच्च दर्जाचे मन:स्वास्थ्य लाभण्याकरीता आज जगभरात योग्य वातावरण आहे का? नैसर्गिक तसेच मानव निर्मित आपत्ती, अज्ञान, अत्याचार, चुकीचे मानवी निर्णय अशा अनेक बाबी आज आपल्या आरोग्याच्या शत्रू बनल्या आहेत.सर्वसामान्य व्यक्तिला आपल्या आरोग्याचे रक्षण करणे जितके आवश्यक आहे तितकेच ते महा कठीण काम आहे.  चांगले आरोग्य ही प्रत्येक व्यक्तिची अमुल्य संपत्ती आहे, त्याचप्रमाणे निरोगी नागरीक ही सुद्धा प्रत्येक देशाची संपत्तीच आहे. ज्याप्रमाणे संपत्ती मिळवून तिचे रक्षण करावे तसेच, आधी आरोग्यवान बनून नेहमीकरीता ते आरोग्य टिकवून ठेवणे तितकेच महत्वाचे आहे.
    कारखाने व शहराच्या विकासासाठी आज सपाटून जंगलतोड होत आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम हवामानावर होत आहे. कारखान्यामुळे दुषीत वायू, दुषीत पाणी, आजूबाजूचे प्राणी आणि मानव दोघांवर परिणाम करीत आहे.त्यामुळे अनेक रोगांचा प्रादुर्भाव होतो आहे. अनेक खेड्या मध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावतो आहे. असेल त्या डबक्यातले पाणी आज माणसाला प्यावे लागते आहे ही वस्तुस्थिती आहे. मैल न मैल दूर अंतरावरून पाणी आणण्याची पाळी आजही आमच्या देशवासियांवर येत आहे. पाणी हे जिवन आहे पण ते पाणीच जर जंतूयुक्त असेल, दुषित असेल तर कसले चांगले आरोग्य लाभणार आहे? गरीबी आणि बेकारी इतक्या मोठ्याप्रमाणात आहे की आजचा दिवस कसा पार पडेल ही चिंता, त्यात महागाईचे अक्राळ-विक्राळ  स्वरूप बघितले तर या जनतेला  सकस अन्न कधी मिळणार आहे? साधं दोनवेळचं निट जेवण या महागाईत मिळणे कठीण तिथे मुलांना दुध, फळे , व्हीटामिन्स टॉनिक देणे कसे शक्य आहे? लोकसंख्या दर सेकंदाला वाढते आहे त्यामुळे  कितीही पुरवठा व्यवस्था वाढवली तरी कमी पडते आहे. काही प्रगत देश सोडले तर बहुतेक विकसनशील देशांत कमी अधिक प्रमाणात ही परिस्थिती आहे.
    खरया अर्थाने आपल्या आरोग्याचे शत्रू कुणी असतील तर ते आहेत गरीबी, दुषित पर्यावरण, नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास, व्यवस्थापनातील दोष,आळस, आरोग्यविषयक अज्ञान, अंधश्रद्धा, भेसळ  करणारे लोभी व्यापारी आणि त्यांना पाठीशी घालून स्वत:चे हित पाहणारे आपलेच भाईबंध.   स्वत:च्या आरोग्याच्या रक्षणाकरीता आज सामान्य माणसाला इतक्या शत्रू  विरूद्ध लढाई पुकारावयाची आहे. आपले आरोग्य हीच जर खरी संपत्ती आहे तर या संपत्तीच्या प्राप्ती साठी प्रत्येकाने प्रयत्न केलाच पाहिजे. अंतर्मुख होऊन विचार केला पाहीजे. आरोग्यवर्धनासाठी आळस झटकून चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत तरच खर्या अर्थाने आपण आरोग्यसंपन्न होऊन प्रसन्न राहू
 सुहास सोहोनी
उजळते क्षितिज[मराठी लेख संग्रह -२००७ ]
www.mazyasamvedana.com




.

No comments: