Sunday, August 26, 2012

जीवनाचे अमूल्य वरदान- नेत्रहिनांना नेत्रदान

      जीवनाचे अमूल्य वरदान- नेत्रहिनांना नेत्रदान

            आज जगभरात अंधत्वाचे प्रमाण वेगाने वाढत आहे.  अज्ञान कुपोषण, प्रदुषण, अपघात, दुरदर्शन किंवा कॉम्प्‌युटरचा अतिरेक अशा अनेक कारणांनी दृष्टीदोष उत्पन्न होतात.  अंधत्वाला  आळा  घालणे अत्यंत आवश्यक आहे.  अन्यथा भविष्यात परिस्थिती गंभीर होईल .  जागतिक स्तरावर अनेक सामाजिक संस्था नेत्रतपासणी, मार्गदर्शन, औषधोपचार ,नेत्र शस्त्रक्रिया, चर्चासत्रे तसेच मृत्यूनंतर नेत्रदान करण्याबाबत जनजागृती  याप्रकरणी कामे करीत आहेत. 
               बुब्‌बुळाच्या आजाराने अंध असलेल्या व्यक्तींना पुन्हा दृष्टी  देता येते.  पण त्यासाठी त्यांचा अपारदर्शक झालेला  नेत्रपटल  काढून तेथे निरोगी व पारदर्शक नेत्रपटल  बसवावयास हवे.  ही कॉर्निअल  ट­ान्सप्लांटेशन नावाची शस्त्रक्रिया करण्यास नेत्रदानातूनच निरोगी व पारदर्शक नेत्रपटल  उपलब्ध होऊ शकते.  मृतव्यक्तीने मृत्यूपुर्व नेत्रदानाची इच्छा दर्शविली  असेल  किंवा मृतकाच्या नातेवाईकांची इच्छा असेल  तरीही नेत्रदान करता येते.  या कार्यासाठी जागोजागी स्वयंसेवक तयार होऊन नातेवाईकांचे काही गैरसमज दूर करून नेत्रदानास सहमत करणे हे मोलाचे कार्य आहे.  नेत्रतपासणी शिबीरात एक गोष्ट  प्रकर्षाने जाणवते की, बालकांमध्ये दृष्टी दोषांचे प्रमाण जास्त आहे.  जिवनसत्वाची कमतरता हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे.  शालांमध्ये  मुलांच्या  डोळ्यांची   तपासणी करून या विषयाबाबत जागरूकता आणणे आवश्यक आहे.  योग्य वेळी  योग्य सल्ला   मिळाला  तर नव्‌या पिढीला  अंधत्वापासून वाचवता येईल .
               नेत्रदानासाठी घोषणापत्र भरून देणे हे जनजागृतीचे एक माध्यम आहे.  प्रत्यक्षात मृत व्यक्ती
च्या  परिवारातील  मुख्य व्यक्तीच्या संमतीनेच नेत्रदान होऊ शकते.  मृतव्‌यक्तीचे डोळे  दान करण्याचे कार्य केवळ  दहा मिनिटांत पूर्ण होते.  चेहरा विद्रुप दिसत नाही किंवा  मुद्दाम सांगितल्याशिवाय कुणाला  कळतही  नाही.  या कार्यासाठी कोणताही खर्च होत नाही.  मृत व्यक्तीच्या खोलीतील  पंखे बंद ठेवावे.  पापण्या बंद ठेवाव्या व शक्य असल्यास डोळ्यांचे  औषध   सल्ल्याप्रमाणे थोड्या  थोड्या   वेळाने डोळ्यात घालावे.  मृत्यूनंतर 4 ते 5 तासात नेत्रदान व्हावयास हवे.  मृतव्यक्तीस चष्‌मा, मधुमेह, ब्लडप्रेशर , असेल  तरीही नेत्रदान करता येते.  नेत्रदानासाठी जनजागृती करण्यास प्रत्येक गावात स्वयंसेवक तयार झाले  तर हे कार्य सुलभ होईल  आणि त्यायोगे अनेक अंध व्यक्तींना दृष्टी  येईल .  त्यांची प्रगती होईल .  कुटूंबात आनंद, समाधान वृद्धींगत होईल .  आपण सहजगत्या पसरवलेल्या विचार प्रवाहाने जर कुणी प्रकाशमान पायवाटेने प्रवास करू शकला  तर यापेक्षा वेगळा  आनंद किंवा पुण्य काय असू शकते ?
              **   अपघातात दुर्दैवाने मृत पावलेल्या व्यक्तींचे नेत्रदान होण्यासाठी कायदा पारित व्हावा .त्यासाठी
ड्रायव्हिंग लायसेन्स मध्ये तशी नोंद करता येईल मृताच्या नातेवायीकांची संमतीची गरज नसावी .**
                                                 ***********************************
          सुहास सोहोनी ----९४०५३४९३५४
          वर्तुळाचे टोक [मराठी लेख संग्रह २००५]
          www.suhassohoni.blogspot.com