Sunday, September 30, 2012

ज्ञानी व अनुभवी म्हणजेच ज्येष्ठ

      ज्ञानी व अनुभवी म्हणजेच ज्येष्ठ
                       वानप्रस्थ हि एक नैसर्गिक अवस्था आहे .याचा फार बाऊ न करता थोड्या पूर्वतयारीने हसत सामोरे जाता येईल का ? ज्येष्ठ नागरिक हा समाजाला उपयुक्त घटक  आहे ,कि तो समाजावरील बोजा आहे ,ह्या प्रश्नाची उत्तरे व्यक्तिगणिक नेहमी निरनिराळी दिली जातात .आपण समाजाचा उपयुक्त घटक म्हणून सक्रीय राहायचं कि परावलंबी जीवन जगायचं हे मात्र ज्येष्ठांनी ज्याच त्याने ठरवायचं आहे .यासाठी मात्र प्रामाणिक  आत्म परीक्षणाची गरज आहे .
                       निवृत्ती हि अटळ गोष्ट आहे .स्त्री आणि पुरुष दोघांनाही ती चुकलेली नाही.परंतु स्त्रियांच्या बाबतीतली निवृत्ती कुणी गृहीत धरीत नाही .नोकरीतील निवृत्ती नंतरही स्त्री ला घरात   निवृत्त जीवन जगता येत नाही .कधी कधी नाईलाजाने कशा न कशात तिला गुंतून राहावे लागते .प्राप्त परिस्थितीत सुसह्य जीवन कसे जगता येईल याची तयारी गृहस्थ आश्रमातच केलेली बरी .त्यामुळे आपले आवडते छंद ,वर्तमान कर्तव्य आणि थकत चाललेले शरीर या सर्व गोष्टींचे संतुलन साधणे शक्य होईल .
                       माणसाचे निवृत्त जीवन वा वृद्धत्व कसे व्यतीत होणार हे त्याच्या मानसिकतेवरआणि वागण्याच्या ,स्वभावाच्या ठेवणीवर अवलंबून असते .माणसाच्या स्वभावाची पाच वर्गात विभागणी होऊ शकते .एक :समंजस वर्ग दुसरा- हौशी-मौजी पण निष्काळजी वर्ग ,तिसरा -  निग्रही वर्ग ,चौथा -रागीट  वर्ग आणि पाचवा स्वतःलाच दोषी समजणारा ,निराश वर्ग .या प्रत्येक वर्गा - तील लोकांचे म्हातारपण हे   नक्कीच वेगवेगळ्या तऱ्हेने व्यतीत होते .आपण कोणत्या वर्गात आहोत आणि भविष्यात कसं राहायचं हे ठरविण्याची वेळ म्हणजे आपला गृहस्थाश्रम किंवा च्लीशी नंतरचा काळ हाच असतो .साठीनंतर कोणतेही स्वभावातील बदल घडविणे सोपे नाहीच .
                         ज्येष्ठ म्हणजे' केवळ वयाने वाढलेले 'एवढाच अर्थ अभिप्रेत नसून ज्येष्ठ हे ज्ञान संपन्न ,अनुभव संपन्न असणार हा विश्वास समाजात निर्माण व्हावयाला हवा .अशा  ज्येष्ठांची समाजाला नितांत गरज आहे .हीच समाजाची अपेक्षा सुद्धा आहे .आजचे ज्येष्ठ नागरिक वर्तमानाशी सुसंगत असे मार्गदर्शन आजच्या तरुण पिढीला आपल्या पूर्वानुभवाच्या, ज्ञानाच्या बळावर करू शकतात का ?नक्कीच ,अशा मार्गदर्शनाची ज्येष्ठांकडून अपेक्षा आहे, आणि असे अनेक अनुभवी ज्येष्ठ समाजात आहेत .अजून एक  महत्वाचा मुद्दा म्हणजे निवृत्तीनंतर भेडसावणारी आर्थिक समस्या .आयुष्यभर कुटुंबाचा भार सांभाळल्या नंतर अनेक ज्येष्ठांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागतो पण   या आर्थिक नियोजनाचा विचार,
कृती गृहस्थाश्रमात  असतांनाच करावी लागते .या बाबतीत अनेक ज्येष्ठ मंडळी जागरूक नसतात असेच दिसून येते .आर्थिक नियोजनाला निवृत्तीनंतरच्या काळात सर्वाधिक महत्व  आहे  .समंजसपणा आणि सकारात्मक विचारधारा  नेहमीच  प्रचंड उर्जा मिळवून देते. हेच सत्य आहे.


                 सुहास सोहोनी
               ९४०५३४९३५४
           www.suhassohoni.blogspot.com
,