Tuesday, April 26, 2011

सत्य साई बाबांचे कार्य कोणत्या पद्धतीने पुढे चालवावे ?

सत्य साई बाबांचे कार्य कोणत्या पद्धतीने पुढे चालवावे ?

देश विदेशातील करोडो भक्तांचे दैवत असलेले सत्य साईबाबा आज आपल्यात शरीर रूपाने जरी नसले तरी समाजासाठी त्यांनी जे महान कार्य करून ठेवले आहे त्या कार्य रूपाने ते आपल्या जवळ नित्य असणार आहेत. प्रत्येक अवतारी महापुरुषाला सुद्धा मृत्यू अटळ आहे, हेच निसर्गाला मान्य आहे. गावागावांमध्ये पाणी उपलब्ध करून देणे, शिक्षणासाठी शाळा निर्माण करणे आणि रोग ग्रस्तांना औशोधाप्चार, शुश्रुषा मिळणे या साठी अद्ययावत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, असे मोठे प्रकल्प त्यांनी उभे केले.

सत्य साईबाबांनी भक्तांना आयुष्यभर भरभरून आशीर्वाद दिले त्याच बरोबर शिक्षण, पाणी, व हॉस्पिटल द्वारा जनतेला कायम उपकृत केले आणि म्हणूनच आज त्यांचे करोडो भक्तगण दु:खात आहेत. त्यांचा वारस कोण ? किंवा इस्टेटीचा मालक कोण ? हा प्रश्न उपस्थित होऊच नये. "सत्य साईबाबा ट्रस्ट " या ट्रस्ट मार्फत त्यांचे कार्य या पुढेही अधिक निष्ठेने सुरु राहावे. भक्तगणांच्या देणग्यांवर ट्रस्ट निर्माण झालेला असल्यामुळे पूर्वी इतकेच किंवा त्या पेक्षा जास्त समाजाभिमुख राहून सत्य साईबाबा ट्रस्ट ने त्यांचे महान कार्य " पवित्र कर्म " समजून चालवावे. जरासुद्धा अपहार होणार नाही याची पुरेपूर काळजी / दक्षता घ्यावी. हीच त्या कर्मयोग्याला खरीखुरी श्रद्धांजली ठरणार आहे.

सुहास सोहोनी
विवेकानंद कॉलनी, अमरावती - ४४४६०६.
फोन न.: ९४०५३४९३५४ .