Saturday, August 18, 2012

* सोन्याची मूर्ती आणि सोन्यासारखी जनता *

      *  सोन्याची मूर्ती आणि सोन्यासारखी जनता *
                          एका  धनाढ्य मंदिरात एक सरावलेला सराईत चोर ईश्वराचे मनोभावे गुणगान गात
होता .हे ईश्वरा ,तू आहेस म्हणून हि श्रीमंत मंदिरे आहेत .तुझ्या अंगाखांद्यावर सोन्याचांदीचे अलंकार,
समोरच्या दानपेटीत करोडो रुपये नित्य येत राहो .तुझ्याच कृपेने ही संपत्ती मला भरभरून मिळत राहो.
तुझे वेडे भक्त  तुला नवनवीन अलंकार देतच असतात .खरे दागिने घालणाऱ्या धनिक लोकांजवळ मी
असतांना त्यांना बेसावध राहू दे ,एवढ माझ्यासाठी तू कर .पोलिसांची माझी कधीही भेट होऊ देऊ नको .
प्रत्येक रात्र काळोखी रात्र तुला करता आली तर किती छान होईल .किंवा रोज पूर्ण रात्रभरासाठी  लोडशेडिंग
करून टाक .मला उत्तम आरोग्य लाभू दे .चौर्य कर्म करीत असतांना मला खोकला ,सर्दी ,शिंका येऊ देऊ
नको .माझ्या हातापायाला कंप यायला नको .हे ईश्वरा तुझ्या कृपेने सध्या बरे दिवस आले आहेत ,अशीच
कृपा असू दे .
                           चोर हे धर्म ,जात,पंथ,पक्ष या सगळ्यांच्या पलीकडे असतात . कार्यपद्धती आणि
श्रेष्ठ्वात भिन्नता असली तरी ते सगळे एकजात चोरच असतात .देवाची सोन्याची मूर्ती चोरतांना ज्यांचे
हात थरथरत नाहीत व देवदेवतांच्या अंगावरील दागिने चोरतांना  सुद्धा मन शांत ठेवणारे हे खरे स्थितप्रज्ञ.
कर्म करा आणि त्वरित फळ मिळवा  [चांगले किंवा वाईट ] हा यांचा मंत्र .प्रसिद्धीची अजिबात हांव
नसलेले हे चोर फक्त पकडले गेले तरच चोर ठरतात आणि अनिच्छेने प्रसिद्धीच्या झोतात येतात .पण
आपली जनता अल्पकाळात सर्व काही विसरते यावर या चोरांचा गाढ विश्वास आहे ,त्यामुळेच हे चोर
उजळमाथ्याने व सन्मानाने गांवभर फिरू शकतात .पोलिसांची यांची अधूनमधून नशिबाने गाठभेट
होत असते .चोर पोलीस हा शब्द सुद्धा कसा जोडीने येतो .बर्याच वेळा हा  एकच शब्द आहे कि काय
असं सुद्धा वाटते .चोरांची संख्या कमी होऊन चोऱ्या होऊ नयेत असं पोलिसांना अधूनमधून वाटते ,पण
पोलिसच नसले तर किती बरे होईल असे चोरांना नक्कीच वाटत असणार .चोर आणि पोलिसांचे नाते
अतूट आहे हे मात्र खर .
                            * पाकीटमार ते सरकारी प्याकेजमार *हे सगळे चोरच असले तरी त्यांच्या 'ग्रेड '
मध्ये बराच फरक आहे .दोघांच्या सुरक्षिततेत फरक आहे .प्याकेजमारांना ऑफिस आहे ,गाडी आहे,
पेन्शन पण आहे .बिंग फुटले तरच अडचण, तीही फक्त काही काळ ,तोपर्यंत सर्व आलबेल .  अहो
शेवटी तो ईश्वर आहेच की !आपण त्याची मनोभावे पूजा करतो कि नाही ?मग !शिवाय तोच तर बुद्धी
देतो ,तोच वाचवेल न ?मग आपण  ही सगळी मंदिर आणखीन  श्रीमंत करू .आपली ही सोन्यासारखी
जनता ,कालांतराने सगळ विसरते ,एवढंच लक्षात ठेवायचं या सोन्यासारख्या गरीब जनतेला कितीही
वेळा ,कुठेही लुटलं तरी चालतंय की !
                 सुहास सोहोनी  9405349354  -0721-2567463
                  www.suhassohoni.bloogspot .com