Thursday, August 23, 2012

प्रार्थना - एक संस्कार

           *   प्रार्थना - एक संस्कार      *
   
             मानवी मनाची जडणघडण हजारो वर्षाच्‌या संस्काराने होत असते.  हे संस्कार रक्‌तात भिनलेले  असतात. अनेक चांगल्या वाईट संस्कारांपैकी प्रार्थना हा एक संस्कार आहे. श्रद्धा आणि भक्तीयुक्त प्रार्थनेने कार्य सिद्धी होते हा विश्वास, हा सुद्धा संस्काराचाच भाग आहे. प्रार्थनेने मन शांत होते, सुविचार मनात येतात, आत्मविश्वास वाढतो. वातावरण प्रसन्न-चेतनामय होते. दु:खी-कष्टी  जीवाला  प्रार्थनेने दिलासा मिळतो.सामूहिक प्रार्थनेने एकी वाढते. माणसाच्या प्रगतीस  उपकारक असणाऱ्या  तसेच शक्तीमान तत्वांची  आपसूकच प्रार्थना केली जाते. त्यातून त्या शक्तीची श्रेष्ठता   स्वीकृत केली जाते.
           ही संपूर्ण सृष्टी ज्यापासून उत्पन्न झाली त्या पंचमहाभूतांपेक्षा म्हणजेच निसर्गापेक्षा सर्वशक्तीमान असे दुसरे काहीही नाही, आणि मानव म्हणजे या संपूर्ण ब्राम्हंडा मधील पृथ्वी नामक ग्रहावरील केवळ  एक जीव. निसर्ग तत्वांचा  सखोल अभ्यास करून जोपासलेलं विज्ञान हे मानवाच्या बुद्धीचे प्रमाण आहे.त्या आधारावर त्याने अनेक आवश्यक-अनावश्यक सुखसोयी उपलब्‌ध करून घेतल्या, परंतू केवळ  एवढ्यावरून निसर्गाच्या श्रेष्ठत्वाला आव्हान दिले जाऊ शकत नाही आणि निसर्गाची प्रार्थना करणे यात काहीच गैर नाही. केवळ  स्वार्थासाठी सत्ता हातात असलेल्या व्यक्तिची प्रार्थना-पूजा होत असलेली आपल्याला नेहमीच दिसते, त्यापेक्षा सर्वचराचराच्या भल्यासाठी निसर्गदेवतेची केलेली प्रार्थना नक्कीच चांगली. पण त्यासोबत योग्य कर्म आवश्यक आहे.
    थोडं बारकाईने आजुबाजूला लक्ष दिले तर असे दिसेल की पूर्वापार सुसंस्काराचा झपाट्याने लोप होत चालला आहे. चांगले विचार, उच्च  नितिमत्ता या कल्पना हास्यास्पद ठरू लागल्‌या आहेत. त्याचाच परिणाम म्हणून  अनाचार,अत्याचार व्यसनाधीनता, स्वार्थाचा अतिरेक आणि स्वत:च्या नेमून दिलेल्या कर्तुत्वातील बेजबाबदारपणा फारच वाढला आहे. या दुर्दैवी  पाश्र्वभूमीवर प्रत्येक व्यक्तिने मनावर संयम ठेवण्यासाठी, एकाग्रता वाढीसाठी, आत्मविश्वासासाठी, सूविचारासाठी दररोज या श्रेð निसर्गदेवतेची, पंचमहाभूतांची प्रार्थना करणे तसेच निसर्गाचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. प्रार्थनेत प्रत्येकाने आपल्या मातृभाषेत फक्त एवढेच म्हणावे.
।। हे निसर्गदेवते मला सुबुद्धी दे।।
               सुहास  सोहोनी ९४०५३४९३५४
          उजळते  क्षितीज [मराठी लेखसंग्रह २००७]
           www.suhassohoni.blogspot.com







मधुमेह म्हणजेच खुले रंगमंच

                        *   मधुमेह म्हणजेच खुले  रंगमंच    *
                                [जागतिक मधुमेह दिन ]

    अपघात झाल्यानंतर रक्तात साखर जास्त आहे ह्या  कारणाने ओपरेशनला  वेळ लागतो आणि आपण मधुमेहाचे रोगी आहोत याचं ज्ञान होतं.  हे स्वास्थ्याबाबतचं अज्ञान बरं नव्हे.  आपल्या रक्तामध्ये विविध घटकांचं प्रमाण निश्चित अशा स्वरूपांत असतं.  त्यात साखर हा सुद्धा एक अतिमहत्वाचा घटक आहे.  जे काही अन्न आपण खातो त्यातील  साखर (ग्लूकोज) रक्तात मिसळली  जाते आणि शरिरातच निर्माण होणाऱ्या  इन्सुलिन नामक द्रव पदार्थाद्वारे रक्‌तातील  साखर  नियंत्रीत केली  जाते.  अनेक कारणांनी शरीरात इन्सुलिन तयार होण्यास बाधा आली  तर सहाजीकच साखर अनियंत्रीत होणार व ती व्यक्ती मधुमेही म्हणून घोषीत होणार.  तेव्हा मधुमेह असणे म्हणजे रक्तातील  साखरेची बिघडलेली  स्थिती.  उत्तम आरोग्य आणि संतुलीत शुद्ध रक्त यांचा फार जवळचा संबंध आहे.
    ज्या प्रमाणे रंगमंचावर विविध नट, नट्या  सहजतेने प्रवेश करतात, आपल्या अस्तित्वाने, प्रभावाने वातावरण निर्मिती करतात, तसे मधुमेही असलेलं   शरीर म्हणजे जणू काही एक रंगमंच असतो, पण हा रंगमंच विविध विषाणू, जिवाणू, रोग विकार यांना आग्रही निमंत्रण देतो आणि शरीरात या विकारांना जागा करून देतो.  हे सगळे  निमंत्रित कलाकार सहाजिकच खलनायकी वर्गातले  असतात आणि खलनायकी प्रवृत्तीनुसार रंगमंचावर प्रभाव पाडून अनारोग्याची वातावरण निर्मिती करतात.  मुख्य म्हणजे एकदा शरीररूपी रंगमंचावर प्रवेश करून जागा मिळवली  की कायमस्वरूपी घर करण्याकडे या खलनायकांची वृत्ती असते.  अनारोग्याने ढासळणारं शरीर म्हणजे खलनायकी पात्रांचा विजय, अशी ही दृष्य परिस्थिती दिसू लागते.
    कोणतेही विकार म्हणजे अनेक वर्षांची हळु हळू  सुरू राहणारी प्रक्रिया असते.  रुग्णाला  त्याची जाणीव नसते.  बालपणातील  विविध समस्या, वातावरण, कुपोषण, पुढे आयुष्यभर असलेला  ताणतणाव, चिंता, तिव्र स्पर्धा, सगळ्याच गोष्टीतील  अनियमितता, व्यसने, खाण्यातील  अतिरेक तसेच व्यायामाचा अभाव अशा अनेक कारणांनी हळू  हळू  स्वास्थ्यसंतुलन बिघडण्यास मदतच होते. शेवटी शरीरात इन्सुलिन निर्माण प्रक्रिया मंदावते म्हणून रक्तात साखर साठते, वाढते.  ही इन्सुलीन निर्माण यंत्रणा जी आपल्या शरीरात आहे तिच्यावर आपल्या अनियंत्रित आहार विहार आणि व्यायामाचा परिणाम होतो आणि म्हणून मधुमेह होण्याची शक्यता वाढते.  याचा अर्थ असा की नियंत्रित आहार, विहार आणि नियमीत व्यायामाने रक्‌तातील  साखर नियंत्रित करता येते.  दैनंदिन वागण्यातील  नियमितपणा आणि त्यादवारे होणारं नियंत्रण या  सर्व गोष्टी  खरंतर आपल्याच हातात आहेत.  यासाठी आपल्या रक्तातील  साखरेची स्थिती आणि त्यामुळे  होणारे दुष्परिणाम याचं यथायोग्य ज्ञान असणं ही एक आरोग्यविषयक गरज आहे.  दिवसेंदिवस  रोगसंक्रमणाची तिव्रता वाढते आहे.  विज्ञानामुळे  नव्या जीवनशैली च्या स्विकारण्यामुळे  काही नवे आजार, व्याधी मुऴ   धरताहेत.  प्रदुषण, अती चरबीयुक्त पदार्थ, अती तेल , तुप, साखर यांचा वापर याव्यतिरीक्त व्यायामाचा अभाव अशा विविध कारणांनी आरोग्य संतुलन बिघडते आणि एकदा का रक्तात साखर साचण्याची स्थिती निर्माण झाली  की नाजूक अवयवांवर लवकर हल्ला  होतो.  प्रतिकार शक्ती कमी होवून कोणताही ऋतुमानातील  आजार चटकन होण्याची शक्यता वाढते.
    उत्तम आरोग्यासाठी आपल्या शरीराचं ज्ञान आपल्याला  असणं अतिशय महत्वाचं आहे.  चाळीशीनंतरची तपासणी व उपाययोजना स्वत:करीता व आपल्यावर अवलंबून असणाऱ्या  सर्वांकरीता  फारच महत्वाची आहे.  चाळीशी हा आयुष्यातील  महत्वाचा टप्पा असल्यामुळे  नेमकी हीच वेळ  स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्याचीही असते.  काळजी करणे म्हणजे घाबरणे नसून एखादा रोग मुळात होऊच नये यासाठी सज्ज असणे, काळजी घेणे केव्हाही योग्य.  बरेचसे विकार प्रथमावस्थेत उपाय योजना, सवईत बदल  करून खात्रीने रोखता येतात.  अनेक समस्यांवर आपण स्वत:च नियंत्रण ठेवू शकतो.
                सुहास  सोहोनी    ९४०५३४९३५४
               क्षण  वेचतांना [मराठी लेखसंग्रह २०१२]
                www.suhassohoni.blogspot.com                       




महागाईच्या समस्येचा शुद्धबुद्धीने विचार व्हावा

                  *   महागाईच्या समस्येचा शुद्धबुद्धीने विचार व्हावा   *

    नेहमीच एक विचार मनात येतो की 6 ते 10हजार रूपये महिना पगार ज्या व्यक्‌तीला मिळतो  त्या कुटुंबाचा खर्च कसा काय सांभाळला  जात असेल  ! अजून तरी 4 ते 6 सदस्य प्रत्येक कुटुंबात आहेत.  अन्न, वस्त्र आणि निवारा एवढ्यावरच प्राथमिक गरजा संपत नाहीत तर आता शिक्षण आणि आरोग्य या गरजा महाग असल्या तरी अत्यावश्यक बनल्या आहेत.  चांगल्या शाळेत शिक्षण मिळावे म्हणून बालक मंदिरापासून पालक रांगेत उभे राहतात.  वाटेल  तितके  डोनेशन द्यायला  तयार होतात.  मुलाच्या गणवेशासोबत वर्षभरातील  विविध खर्चाची बेरीज केली  तर अवाढव्‌य खर्च लक्षात येईल .  आरोग्यावरील  खर्च तर संपूर्ण परिवाराला  अगदी पार केविलवाणं करून टाकतो.  घराचं भाडं, धान्य किराणा, खरेदी,ग्यास    सिलेंडर , वीजबील , पाणी बील , दूरध्वनी बिल , मुख्य म्हणजे पेट्रोल चा खर्च असे हे सगळे  खर्च त्या कुटूंबाच्‌या आर्थिक नियोजनाची पार वाट लावून टाकतात.  त्यानंतर हौसमौज, मनोरंजन करता येत असेल ?
    सरकारी नोकरीत असणाऱ्या  सर्वांना सहावा वेतन आयोग लागू झाल्‌याबरोबर सगळ्या  बाजारपेठा महागल्या आणि या महागाईची झळ लोकसंख्येच्या 90% असणाऱ्या , सरकारी नोकरीत नसणाऱ्या  सर्वांना सोसावी लागत आहे.  महिना 25 हजारावर पगार किंवा उत्पन्न असणाऱ्या  व्यक्तिना अजून तरी महागाईची दहशत बसलेली  नाही. याच 30% असलेल्या नव श्रीमंतांच्या भरवश्यावर बाजार गरम होतो आहे.  महागाई वाढते आहे आणि उर्वरित समस्त जनता होरपळून निघते आहे.  उजाडणाऱ्या  प्रत्येक दिवशी महागाईच्या भस्मासूराचं तोंडं आणखी मोठं होत चाललयं.  मुख्‌य म्हणजे पेट­ोल  डिझेल चे दर बेसुमार वाढत चालले आहेत.  यामुळे  ट्रान्सपोर्ट वाढणार नंतर अगदी सहज, प्रत्येक वस्तूंचे भाव वाढणार.  हे एक दुष्ट चक्र आहे.  संबंधित विभागाचा पेट्रोल  भाववाढीवर मुळीच ताबा नाही हे उघड आहे.  त्यातच अतीव लोभापायी प्रत्येक आवश्यक वस्तूतील  भेसळ , हा गुन्हा जरी असला  तरी अशा कृत्यांची जराही भिती वाटेनाशी झाली आहे.  तीच गोष्ट  रासायनिक प्रक्रियेद्वारे पदार्थ, फळे , पिकवण्याबाबत.  हे सगळे  भेसळ माफीये माणसं नाहीतच, तर सामान्यांच्या जीवाशी खेळणारे मृत्यूदूतच आहेत.  खरोखर आज कुणाही गुन्हेगारा कायद्याची जराही भिती वाटत नाही.
    ही अफाट  लोकसंख्या हेच तर महागाईचं मुख्य कारण आहे.  महागाईचे दुष्परिणाम काय असू शकतात हे येत्या काही काळात दिसणारच आहेत. अन्नाचे, धन्याचे साठे, सडताहेत पण जनतेला  स्वस्तात उपलब्ध होत नाहीत.  यावरून काय बोध घ्यायचा? जनतेच्या सुखाची काळजी , तळागाळातल्या गरीबांची काळजी आहे, असे निवडणूकीच्‌या वेळी  सांगणाऱ्या  आमच्या गर्भश्रीमंत राजकारणी नेत्यांना महागाईची झळ  बसते कां? शासनाची इच्छाशक्ती जर जागृत असेल  तर जीवनावश्यक सर्व वस्तूंचे दर नियंत्रीत करावे.  आज समस्त जनतेला  महागाईच्या महाभयानक वणव्यात झोकून दिले आहे.  लोकशाहीत लोक त्रस्त आहेत.  महागाई हा मुद्दा  महÎत्वाचा नाही का? नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणे योग्य नाही.  शासनाने* महागाईच्या समस्येचा शुद्धबुद्धीने विचार करावा.**
                        ुुुसुहास सोहोनी ९४०५३४९३५४
                  क्षण वेचतांना [मराठी लेखसंग्रह २०१२]
                     www.suhassohoni.blogspot.com