Friday, January 25, 2013

* प्लास्टिक कचऱ्याच्या भस्मासुराचे व्यवस्थापन -रिसायकलिंग प्लांट *

    *   प्लास्टिक कचऱ्याच्या भस्मासुराचे व्यवस्थापन -रिसायकलिंग प्लांट   *
          विविध कारखान्यातून उत्पादन जेंव्हा बाजारात आणि शेवटी आपल्या घरांत येत तेंव्हा प्रत्येक वस्तू प्लास्टिकच्या वेष्टनात असते .वेगवेगळ्या आकर्षक आकारांत ,रुपात रंगी बेरंगी अशी हि सर्व प्लास्टिक
 वेष्टने आपल्या घरांत दररोज जमा होत असतात .या बाबतीत आपला पूर्णपणे नाईलाज असतो .आपली इच्छा असो वा नसो ,आपली परवानगी सुद्धा न घेता या प्लास्टिक पिशव्या ,वेष्टने आपल्या घरांत घुसतात ,
कुठेतरी जागा मिळवतात .पुढे कधीतरी कचऱ्याच्या टोपली मधून  सहजगत्या रस्त्याच्या कडेला कचरा
कुंडीत ,आजूबाजूच्या नाल्यांमध्ये फेकले जाते .त्यानंतर कितीतरी काळ हे प्लास्टिक जेथे फेकले तेथे
अस्ताव्यस्त पणे पडून असतं .छोट्या मोठ्या नाल्या अवरुद्ध होतात ,घाण साचते .दरदिवशी पुन्हा प्रत्येक घरातून 'सहजगत्या 'प्लास्टिक पिशव्या /वेष्टने घराबाहेर फेकल्या जातात .
            सर्वच गावें ,शहरे आणि संपूर्ण देशभर जवळ जवळ असेंच चित्र आहे .कोणत्याही वातावरणात प्लास्टिक नष्ट होत नाही ,विरघळत नाही ,जाळले तरी वायू रूपाने वातावरणात साचून राहते .प्रत्येक गावांत दर दिवशी हा प्लास्टिकचा ढीग वाढतच जाणार .त्याची विल्हेवाट लावायची कशी ? त्यासाठी ' रिसायकलिंग 'हा एक चांगला पर्याय होऊ शकतो .जिल्हावार हा उद्योग हवा ....त्यासाठी घरा घरात येउन पोहोचणारे हे प्लास्टिक रिसायकलिंग प्लांट्स मध्ये नेलं गेलं पाहिजे .
           * प्रत्येकाने आपल्या घरातील कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक नाल्यात ,रस्त्यावर किंवा बाहेर कुठेही फेकू नये .ते स्वच्छ करून घरातच साठवावे व प्लास्टिक गोल करणाऱ्या व्यक्तीस /एजन्सीस /संस्थेस द्यावे .जेणेकरून ते प्लास्टिक रिसायकलिंग प्लांट मध्ये पोहोचेल .म्हणजेच गावभर कुठेही प्लास्टिक पडून
राहिलेले दिसणार नाही ,नाल्या तुंबणार नाहीत .
            *घरातील विविध प्रकारचा कचरा प्लास्टिकच्या थैलीत  कोंबून नाल्यात टाकले जाते ज्यामुळे नाल्या तुंबतात.आपली हि कृती योग्य नाही हेच नेहमी सिध्द होते .यासाठी मी /माझ्यापासून /स्वतः पासून बदलण्याची गरज आहे .
             *जाड प्लास्टिकच्या मोठ्या पिशव्या रस्त्यावर फेकण्या  पेक्षा  विविध वस्तू खरेदी साठी त्या वापरण्यास हरकत नसावी .अश्या पिशव्यांचा पुनर्वापर होऊ शकतो .
              *फेकून दिलेले अन्न पदार्थ प्लास्टिक पिशव्या सहित जनावरांच्या पोटात जाऊन पशुधनाची जीवहानी नित्य होत आहे .हे त्वरित थांबवायला हवे .प्लास्टिकच्या कचऱ्याच्या भस्मासुराचा पुनर्वापर  करण्याचे सक्षम व्यवस्थापन हवे .
           सुहास सोहोनी
       www.suhassohoni.blogspot.com
       www.mazyasamvedana.com