Wednesday, April 6, 2016

*होऊन जाऊद्या वेगळ्या विदर्भासाठी “ सार्वमत “*

*होऊन जाऊद्या वेगळ्या विदर्भासाठी “ सार्वमत “*
वर्षनुवर्षे पुढे ढकलला जाणारा वेगळा विदर्भाचा प्रश्न पुन्हा एकदा डोक वर काढतो आहे .कधी कधी मुद्दाम एखादा विषय लोकांपुढे फेकला जातो ,जनता त्यात गुंतून जाते ,काही जुने विषय सहजच विसरले जातात.काही प्रश्न आहेत .विदर्भाला वेगळे होण्याची गरज आहे का ?वेगळा विदर्भ आर्थिक दृष्ट्या सक्षम असणार आहे एक ?बहुतांशी भाग हा खेड्यांचा असून मागासवर्गीय आहे ,विकासाचा दर कमी आहे तेंव्हा वेगळा विदर्भ झाल्यावर केंद्र शासनाकडून वेगळी मदत मिळू शकते का जी आज महा. राज्या कडून न मिळाल्यामुळे विदर्भ वंचित आहे .मुख्य म्हणजे विकासासाठी आजची नेते मंडळी का बर कमी पडली ?विदर्भातील पर्यटन,सिंचन ,शेती आणि औद्योगिक प्रकल्प स्वबळावर उभेराहून प्रगती साधू शकतील का?
विदर्भात भरपूर खनिज संपत्ती आहे ,महाराष्ट्राला वीज उपलब्ध करून दिली जाते .मोठ्या प्रमाणात जंगले आहेत .कापूस, संत्रा प्रसिद्ध आहे पण सध्या शेतीच्या अनेक समस्या आहेत .फार मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग बेरोजगार आहे .पाण्याची समस्या सोडवली तर मात्र विकासासाठी नवनवीन प्रयत्नांना इथे नक्कीच वाव आहे .पर्यटन उद्योग सध्या तरी फारच दुर्लक्षित आहे .आरोग्याच्या सोई काही शहरात आहेत पण ग्रामीण भागात परिस्थिती बरी नाही ,भ्रष्टाचार आहे,गोंधळ आहे ,अनियंत्रित असून खाजगी आरोग्य सेवा [व्यवसाय ]फारच महागडा आहे .सर्व स्तरावर विकास होईल का ?वेगळा विदर्भ नेमका कुणाला हवा आहे ?नेत्यांना की बहुसंख्य जनतेला ? या प्रश्नाचेउत्तर खर तर लोकशाही प्रणालीत जनतेने ठरवायला हवे .
संपूर्ण महाराष्ट्रातील जनता [विदर्भासहित ]व नेतेगण या सर्वांनी वेगळ्या विदर्भ राज्याच्या विचार, आचार व कार्यप्रणालीत एक गोष्ट मात्र आवर्जून लक्षात घ्यावी की “ दुसऱ्या marathi भाषिक राज्य निर्मितीच्या “प्रयत्नासाठी आपण “स्वजनांशी”बोलणी करणार आहोत .एकाच परिवारातील सदस्य आपापसात निर्णय घेणार आहेत .असे वातावरण निर्माण होणे गरजेचे आहे ,तेंव्हा हिंसा,जाळपोळ ,कर्फ्यू अशा घटना कुठेही होणार नाहीत ही काळजी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे .खेळीमेळीच्या वातावरणात विदर्भाचे वेगळे राज्य व्हावे .दोन भाऊ सक्षम झाल्यावर स्वत:चा वेगळा संसार थाटतात असे व्हावे .वैदर्भीय जनतेने पुढाकार घेऊन या प्रश्नावर सर्वंकष विचार करावा .शासनाने जनतेचा विचार ग्राह्य धरावा म्हणून –होऊन जाऊद्या ,वेगळ्या विदर्भासाठी – “सार्वमत”.शांततेच्या मार्गाने विदर्भ राज्य निर्मिती झाल्यास जगभरात महाराष्ट्र मोठा होईल .
सुहास सोहोनी
विवेकानंद कॉलोनी ,अमरावती -६ मोबा:८६२६०६०६४६

1 comment:

नितीन जोगळेकरNitin Joglekar said...

सोहनीजी, आता विदर्भातील जनतेच्या लोकभावनांशी सहमत सरकार आले आहे. कै.डाॕ. श्रीकांत जिचकार यांच्या एका लेखात करसंकलन ही समस्या होती. आता विदर्भात उद्योग वाढीला लागून सरकारी सेवकांचे पगार व विकासाला आवश्यक उत्पन्न करातून मिळणार असेल तर विदर्भ वेगळा व्हायला एक राजकीय सोडता अडचण नसावी.