Thursday, January 7, 2016

* अराजकतेच्या उंबरठ्यावर *



                            * अराजकतेच्या उंबरठ्यावर *
          उंच पर्वतावरून घसरणाऱ्या खडकाचे प्राक्तन काय असू शकते ! मध्ये जर काही भक्कम आधार नाही मिळाला तर गडगडत खोल दरीत कोसळणार ,दुसरे काय ! अफाट विश्वातील या पृथ्वी नामक ग्रहावरील मानवी संस्कृतीचे सध्या असेच काहीसे झालेले दिसते .प्रत्येक राष्ट्राला इतरांपेक्षा प्रबळ बनण्याची इर्षा आहे . “विकास” या कल्पनेने पुरते पछाडलेले आहे .निसर्गाला बटिक बनवून सगळी भौतिक सुख ओरबाडून कशी पदरात पडून घेता येतील या साठी समस्त मानवी मेंदू कार्यरत आहेत .विकास आणि यश या दोन्हीचे नेमके अर्थ आणि मर्यादा यांचे आकलन होत नसल्याने जीवनाचे अंदाज चुकताहेत ,असे निष्कर्ष नित्य समोर येत आहेत.यशाच्या शिखराकडे मानवी संस्कृती जात आहे कि हा भास आहे ?
           स्वतःला प्रगत समजणारी सगळीच राष्ट्र आज विविध संकटात आहेत .सुबत्तेत अग्रेसर असणारी अमेरिका आणि युरोपातील बरेच देश आज प्रखर आर्थिक विवंचनेत आहेत विकासाच्या नावाखाली “अनुत्पादित “गोष्टींवर संपूर्ण जगात प्रचंड खर्च होत असल्याने जागतिक मंदीची लाट आली नाही तरच नवल .सध्या असलेली आणि भविष्यात कितीतरी पतीने पतीने वाढणारी भीषण महागाई हि केवळ एक चुणूक आहे .जगभरातील कामगार कपात ,डॉलर आणि रुपया यांची घसरण ,आर्थिक नाकेबंदी ,गुंतवणूक दारांची नित्य उघडकीस येत असलेली फसवणूक ,अफरातफर ,प्रचंड भ्रष्टाचार ,सतत घाम फोडणारा शेअर बाजार , व्याज दर वाढवून बँक व्यवस्था वाचवण्याचा प्रयत्न ,गरीब आणि श्रीमंतीची द्रुत गतीने वाढणारी तफावत या सगळ्या गोष्टी काय सुचवतात ?फक्त अस्थिरता !
         उत्तर आफ्रिका ,पश्चिम आशिया ,युरोप सशस्त्र क्रांती किंवा आतंक वादाने त्रस्त आहे .प्रस्थापितांना उखडून फेकले जात आहे . हिंसा आणि प्रतीहिंसा उग्र रूप धारण करीत आहे .मध्य आशियात दहशत वादाची प्रशिक्षण केंद्रे तयार आहेत .धर्म आणि पंथाच्या नावावर राष्ट्रे एकमेकांच्या जीवावर उठली असून बलाढ्य राष्ट्रे त्यांना  शस्त्र पुरवित आहेत .शस्त्रसज्ज होऊन संधीची वाट पाहत आहेत .अणुशक्ती व हैड्रोजन शस्त्रांचे परीक्षण सुद्धा होत आहे .एकमेकाला अणु युद्धाची धमकी दिली जात आहे .रासायनिक शस्त्रांचा वापर होत आहे .वास्तविक अणुउर्जा म्हणजे बंद बाटलीतील राक्षस आहेत ,याचे भान नाही .यामुळेच भूगर्भातील हालचालींना जरा जास्त वेग आला आहे .त्यामुळे भूकंप ,जलप्रलय होत आहेत .
        पृथ्वीवर नैसर्गिक प्रकोप नेहमीच होत असतात पण खर्या अर्थाने नुकसान होणार असेल तर ते *”मानवी मेंदूतील “प्रकोपामुळे निसर्गातील समतोल बिघडवल्या मुळे आपण कदाचित अराजकतेच्या उंबरठ्या वर उभे आहोत आणि वेळेवर न सावरल्यास गडगडण्याची वेळ येऊ शकते .
                                 सुहास सोहोनी
                       विवेकानंद कॉलोनी ,अमरावती ४४४६०६ .
                        फोन २५६७४६३ मोब.९४०५३४९३५४
                       http://suhassohoni.blogspot.com 
           

No comments: