Monday, July 16, 2012

लक्ष्य हवे फक्त भारतीय असण्याचे

                                             *  लक्ष्य हवे फक्त भारतीय असण्याचे*
                        विदेशात आपण असतांना आपल्याला जात ,पंथ किंवा प्रांतनिहाय कुणीही ओळखत नाही तर
        फक्त भारतीय वा इंडिअन म्हणूनच ओळखलं जातं.संपूर्ण भारतीयांची एकी दर्शवणार "मिले सूर मेरा तुम्हारा '  हे भाराऊन टाकणारे गीत लाखो करोडो भारतवासीयांनी केवळ कंठातून गाण्याऐवजी हृदयातून गाण्याची गरज आहे . भारतीयत्वाचा ध्यास असणार सक्षम नेतृत्व कुठेही दृष्टीपथात दिसत नाही .एखाद्या विशिष्ट घटनेमुळे खडबडून एकतेच्या गर्जना करणारी जनता थोड्याच वेळात जातपात ,धर्म ,भाषा,प्रांत आणि मुख्य  म्हणजे विविध राजकीय पक्षांमध्ये विभागली जाते .या सगळ्या अडथळ्यातून पार होऊन केवळ भारतीय'असण्याची "गरज आहे. आसेतुहिमाचल पसरलेल्या आपल्या देशाचा राज्यकारभार सुरळीत चालावा ,सोयी सवलती तत्परतेने उपलब्ध व्हाव्या  या हेतूने भाषाप्रभुत्व  असलेल्या प्रदेशानुरूप, प्रांतनिहाय विभागणी केली गेली ही वस्तुस्थिती आहे,याचे भान सर्वांनीच ठेवावयास हवे .
                  नेते हे मुठभर असतात पण त्यांचे समर्थक कारोडोंच्या संख्येत असतात .नेतृत्व हे साहजिकच महत्वाकांक्षी असते .त्यांच्या सुप्त आणि गुप्त इच्छा असणारच ,त्यानुसारच नेत्यांची चाली बदलत असते ,पण करोडो समर्थक आपसात विभागले जातात .असे विभागले गेलेले ,विखुरलेले पक्षीय अस्मिता जपणारे लाखो समर्थक, कार्यकर्ते  देशातल्या प्रत्येक शहरात ,गावात आणि मोहल्ल्यात जागोजागी आहेत . आपली ओळख सांगतांना प्रत्येक जण जात पात,प्रांत किंवा राजकीय पक्षाची ओळख सांगतो  आणि इथेच अखंड भारतीयत्वाच्या संकल्पनेला छेद जातो.देशाच्या कनाकोपर्यात प्रत्येक भारतीय सुरक्षित हवा  . मानवी  स्वभावधर्मा प्रमाणे जात किंवा प्रांतवादातून वर्चस्व प्रस्थापित करण्याची कितीही इच्छा असली तरी सूड वृत्तीला थारा नकोच.*जात पात धर्म, दुषित पूर्वग्रह  या चौकटीतून बाहेर या .
                              आज वर्तमानात सर्व जग विविध समस्यांनी ग्रस्त व त्रस्त आहे .दहशतवाद असंख्य फणे काढून डुख धरून बसला आहे .आर्थिक मंदी ,घोटाळे अविश्वास्नियता,कामगार कपात, बेरोजगारी ,गरिबी ,अनारोग्य ,  प्रदूषण असूनही प्रतिकूल परिस्थितीत विज्ञानातील प्रगती व विकासाचा वेग यामुळे भारताकडे सगळ्या जगाचे लक्ष्य आहे .आध्यात्मिक तत्वज्ञानाच्या  सकारात्मक  अश्या विचारप्रवाहाचा प्रभाव जगभर वाढतो आहे .नेमक्या याच वेळी भारतात कुठेही अंतर्गत कलह नको .प्रत्येकाच्या मनात जागृत असलेली फक्त  भारतीयत्वाची मनीषा तीव्र करण्याची आवश्यकता आहे .या इच्छेला 'सकारात्मक  उर्जा 'कशी प्राप्त होईल या विचारांनी भरलेल्या  सक्षम नेतृत्वाची गरज आहे .विचारवंतांनी देशविघातक कार्याला एकत्रित विरोध करण्यास समोर यायला हवे .प्रत्यक्ष कृतीतून एकी स्थापित होण्याची गरज आहे ,केवळ कल्पना विलास नको .शंभर कोटीपेक्षा जास्त असलेल्या जनतेने अखंड भारतीयत्वाच लक्ष्य कृतीतून सिद्ध केले तर भविष्यातील भारत  देश  नक्कीच बलवान ,समर्थ , व  धर्मनिरपेक्ष आणि सक्षम असेल .सगळी किल्मिष दुर करून एकदा फक्त *आपण सगळे  भारतीय आहोत *ही संकल्पना दृढ करा .
---------------------------------------------------------------------------------------------------
        सुहास सोहोनी
    घे ....उंच भरारी [लेख संग्रह २०१६  ]मोबा .९०५३४९३५४




No comments: