Tuesday, May 10, 2011

नातवंडात रमलेले आजी आजोबा यांचे स्वर्गसुख

नातवंडात रमलेले आजी आजोबा यांचे स्वर्गसुख

नशीबवान आहेत ते आजी आजोबा ज्यांना नातवंड सोबत राहाण्याच, खेळण्याच भाग्य लागत. अर्ध शतकाच्या लांबलचक प्रवासात सुख दुःखाचे असंख्य चढ उतार पार करीत एका सोनेरी वळणावर नातवंडांच्या प्रतीक्षेचे वेध लागतात. हा काही महिन्यांचा काळ म्हणजे आनंद, काळजी, अनामिक हुरहूर असंख्य भावभावनांचा नुसता कल्लोळ असतो. जन्माला येणाऱ्या बाळाच्या नुसत्या कल्पनेने ती वास्तू कणाकणाने फुलते/ खुलते, आणि एका नेमक्या मुहूर्तावर सुंदर, गुलाबी, मखमली, गोबर्या गालांचे ते बाळ अनेकांना विवध नात्यांनी एकमेकांशी बांधून टाकत. एका नव जीवनाची पुन्हा सुरवात होते. कृतार्थ मातापिता आकंठ आनंदात तरंगत असतात. जणू काही आपली खूप जुनी ओळख आहे अश्या थाटात टुकू टुकू बघत आजी आजोबांना नव चैतन्य मिळवून देत. त्या लबाडाच कौतुक करतांना, खेळवतांना, त्यांचा थकवा दूर पाळतो. शारीरिक व्याधीने त्रस्त असले तरी हाताच्या पाळण्यावर बाळाला घेऊन बडबडगीत गात खोलीभर फिरणारे आजी आजोबा प्रत्यक्ष विधात्याशी गुजगोष्टी करीत स्वर्गसुखाचा अनुभव घेत आहेत असा भास होतो. पलंगावर पहुडलेली पणजी जेंव्हा तिचा ४ वर्षाचा पणतू येतो तेंव्हा टुणकन पुढे येते आणि बोबड्या बोलीत त्याच्या विवध खेळत भान विसरते. तो प्रसंग तिच्या साठी श्रेष्ठ साध्य योग असून त्या संपूर्ण वास्तूसाठी निखळ अमृत योग आहे.

नातवंडांशी मनसोक्त खेळायला मिळण म्हणजे आजी आजोबांसाठी जगातील सर्वोत्कृष्ठ टोनिक मिळण्यासारखच आहे. जादूच्या कान्डीने बदल घडवावा तस मन उल्हासित करणारे हे टोनिक सर्व श्रेष्ठ अशे. नातवंडांचा रुसवा फुगवा, निरागस हास्य, हट्ट, कल्पना विश्व, अनुकरण करण्यातील तीव्र बुद्धिमत्ता आणि कुठल्याही भावविकारांचा स्पर्शहि न झालेला निरागस लोभस पणा या अनोख्या विश्वात पुरेपूर गुंतून जाणे, हा आनंदच आगळा आहे. अफाट सत्ता आणि करोडोची संपत्ती सुद्धा या आनंदापुढे कमीच आहे. भाग्यवान आजी आजोबांनाच हा आनंद मिळतो अस येवढ्याकरता म्हणावस वाटत, कि नोकरी व्यवसायामुळे मुले सुना दूर असतात, अनेक कारणांमुळे आजी आजोबांशी जवळीक राहत नाही. कधीतरी पत्रात किंवा फोनवरच थोडस बोलता येत, बाकी वेळ केवळ आठवणी आणि काळजी आणि हुरहूर.

विविध भूतिक कारणांमुळे आज असंख्य वयस्क जेष्ठांना एकट्यानेच रहाव लागत. कितीतरी जोडप्यांना एकमेकांची सावली आधार बनून आहे ते जीवन जगावे लागत, कारण, पर्याय नाही. सुंदर घर आहे, फर्निचर आहे, पैसा अडकाहि भरपूर आहे, पण घरात केवळ दोघाच. घर खायला उठत. हळूहळू सवय व्हायला लागते. ते स्वतः साठी, फर्निचर साठी, घरातल्या बगिच्या साठी जगात राहतात. पण त्या विधात्याच्या मनात काही वेगळाच असाव, कारण असंख्य कारणांनी माता-पित्याच छत्र हरवलेली, घरा-दाराला मुकलेली, आईबापाने त्याग केलेली असंख्य बालके निराधार निराश्रित जीवन का जगतात ? पुन्हा पर्याय नाही. त्या बालकांना सुद्धा जगणे क्रमप्राप्त आहे. जीवन देणे आणि संपवणे हे दोन्ही अधिकार त्या विधात्याने स्वतः जवळ ठेवलेत. या बालकांना आई बापच नाहीत तर आजी आजोबा कुठून मिळणार ? एक गोष्ट खूपच महत्वाची वाटते, ती म्हणजे माये साठी आसुसलेली हि बालके आणि एकाकी जीवन कंठणारे आजी आजोबा यांच्यात त्यांच्याच शहरात फक्त काही मैलांचच अंतर आहे. हे काही मैलांचच अंतर जर मिटवता आल तर स्वतः च म्हणून काहीही नसलेल्या निराधार बालकांना आजी आजोबांची माया तरी मिळेल, आपुलकी, संरक्षण तरी मिळेल. अजूनही आम्ही विचारांच्या परंपरेच्या बंदिस्त कोशात घूसमटण्यात समाधान मानतो आहोत. पण तो बंदिस्त कोश आपल्या बळकट पंखांनी फोडून जेंव्हा विविध रंगी फुलपाखरू आसमंतात गिरक्या घेऊ लागेल तेंव्हा नशीबवान असतील ते आजी आजोबा ज्यांना नातवंडांसोबत राहाण्याच, खेळण्या बागडण्याच, आणि मुख्य म्हणजे खळखळून हासण्याच भाग्य लाभेल. खरच अस होईल ?

सुहास सोहोनी,
वीकास वार्ता पुरस्कार -१९९० महा शासन,
राष्टीय एकात्मता फेलोशीप - २००५ अखील महा पत्रकार व पत्रलेखक संघ,
सदस्य महाराष्ट्र वृत्त पत्र लेखक असोसीएशन,
सहसचीव डाय्बेटीक असो. इंडीया, अमरावती.
please visit at : www.suhassohoni.blogspot.com

No comments: