Saturday, May 7, 2011

देव आपल्यावर का रुसला हेच कळत नाही !

देव आपल्यावर का रुसला हेच कळत नाही.

जन्माने किंवा अपघाताने अपंगत्वाचा एकदा का एखाद्या कुटुंबात शिरकाव झाला कि त्या परिवाराला जणू एक्खाद्या युद्ध प्रसंगाला सामोरे जावे, तसे या अपंगत्वावर मात करण्यासाठी झगडावे लागते. अनुवांशिकता, गुणसूत्रातील दोष, गर्भार अवस्थेत मातेचे कुपोषण, चुकीची औषधे, अपघात, ताप, रक्तदाब, मधुमेह, थायरॉईड चा प्रभाव, अशा अगणित आणि अनाकलनीय कारणाने जन्मतः शारीरिक किंवा मानसिक अपंगत्व प्राप्त होते. त्याशिवाय व्यसनांचा अतिरेक, रासायनिक द्रव्य किंवा वायू वा किरणोत्सर्गाने येणारे अपंगत्व म्हणजे कठीण परीक्षाच आहे. अपंग व्यक्ती व तिचे माता पिता यांच्या हृदयाची कालवाकालव इतरांना दिसली तरी त्या यातना त्यांच्या त्यांनाच सोसाव्या लागतात.

आज आरोग्य विज्ञान शास्त्र अत्यंत प्रगत आहे. प्रसूतीपूर्व विविध चाचण्या आहेत. जनता साक्षर आहे. पण तरीही जन्मतः अपंगत्व, त्यापेक्षा मेंदूचे रोग आणि मानसिक अपंगत्वाच प्रमाण काळजी करण्या इतकेच जास्त आहे. प्रसूतीपूर्व चाचण्या द्वारे या प्रकारची कमतरता का सिद्ध होऊ शकत नाही ? चाचणी मशीन ची अचूकता व त्याचे निदान करण्याची प्रगल्भ बुद्धिमत्ता प्रत्येक छोट्या मोठ्या शहरात उपलब्ध आहे का ? प्रगत आरोग्य विज्ञान शाश्त्राचा सूक्ष्म अभ्यास होणे गरजेचे असून आर्थिक दृष्ट्या स्वस्त असण्याची गरज आहे, कारण समस्या ग्रस्त परिवारासाठी हा प्रचंड आर्थिक मनस्ताप आहे. एकदा समस्या सिद्ध झाली कि या दवाखान्यातून त्या दवाखान्यात धावणाऱ्या आई बापाला वंशपरंपरागत दोष, गुणसूत्रातील दोष, किंवा गर्भारपणात झालेल्या न झालेल्या चुका यावर प्रश्नांच्या फैरी ऐकाव्या लागतात. जन्मापात्रीकेतील दोष, पूर्वजांचा शाप, नक्षत्र वा ग्रहांचा त्रास, पुनर्जन्म अश्या अनेक गोष्टीतून मनस्ताप होतो. कुठेही उत्तर सापडत नाही. आपला देव आपल्यावर का रुसला हेच कळत नाही.

नीट विचार केला तर सुधृद सशक्त शरीर, चांगल्या सवयी, काही शारीरिक दोषांची पूर्व माहिती त्यावर वेळेआधी केलेले उपचार, शरीर शाश्त्राची आवश्यक माहिती, प्रसन्न मन, योग्य वेळी होणारी गर्भधारणा अशा अनेक गोष्टींचा शास्त्रीय दृष्ट्या विचार करावा लागेल.

अपंग, अंध वा मतीमंद अश्या समाज घटकांसाठी बँकेच्या ठेवींवर २ टक्के व्याज जास्त मिळावे, तसेच समस्या ग्रस्त असलेल्यांसाठी औशोधोप्चार, चाचण्या सरकारी व खाजगी रुग्णालयात सुद्धा ना नफा ना तोटा तत्वावर उपलब्ध असाव्या. हा खर्च भरून काढण्यासाठी धनवान व सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा. असे झाले तर पुन्हा कोणी हिम्मतवाला एवरेस्ट सर करेल. अथांग सागर पोहून जाईल. नवनवी कल्पना जिद्दीने साकार केल्या जातील. आत्मविश्वास जागृत करून या समाज घटकाला दिशा दाखवायची गरज आहे. देवाचा रुसवा आपण घालवू या !

सुहास सोहोनी
वीकास वार्ता पुरस्कार -१९९० महा शासन
राष्टीय एकात्मता फेलोशीप - २००५ अखील महा पत्रकार व पत्रलेखक संघ
सहसचीव डाय्बेटीक असो. इंडीया, अमरावती
please visit at : www.suhassohoni.blogspot.com

No comments: