Sunday, May 1, 2016

*बेरोजगारांचे तांडे आणि कामगार दिन *



                     * बेरोजगारांचे तांडे आणि कामगार दिन *
              भरपूर कामगार नोकरीवर ठेऊन कारखान्यात उत्पादन घ्यायचं की दिवसातले १६ -१८ तास काम करून अफाट उत्पादन देणारे यंत्र /संगणक वापरायचे !यात अखेर संगणकांचा विजय होतांना दिसतो आहे .निर्मिती क्षेत्रात प्रचंड उलथापालथ घडवणारे हे राक्षसी क्षमतेचे महागडे संगणक जणू कामगारांचे शत्रू सिध्द होत आहेत .उत्पादन प्रक्रियेतून कामगार वर्गाला कमी करणे किंवा वगळणे हे भांडवलशाही समाज व्यवस्थेचे अंतिम उद्दिष्ट असेल ,असे चित्र जिकडे तिकडे दिसते आहे .प्रत्येक उद्योग किंवा सेवा व्यवस्थापनाला शेवटी नफ्याचे गणित करावे लागणार आहे .प्रचंड उत्पादन क्षमता असलेल्या विदेशी उद्योग समूहाकडून सध्या मोठ्या प्रमाणात अनेक वस्तू आयात होत आहेत त्यांमुळे जीवघेण्या स्पर्धेला सुरवात झाली आहे ,त्याचा परिणाम म्हणजे कामगार कपात किंवा उद्योग बंद करण्यात येत आहेत .
               बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे ,समाजातील प्रत्येक घटक आपापल्या विचारधारेत मश्गुल आहे .विविधते बरोबर विषमता सुद्धा वाढते आहे .कुणाला कुणाचे सोयरसुतक नाही.या असंख्य हातांना काम मिळणे गरजेचे आहे .हा भविष्यातील स्थिरतेचा प्रश्न आहे .बेकारी व स्थिरतेच्या समस्येवर त्वरित विचार कार्यान्वित होणे गरजेचे आहे अन्यथा मनाचे विकार ,गुन्हेगारी ,हिंसाचार ,वाढती वाटमारी ,सामाजिक ताणताणाव असे अनेक धोके आहेत .हे प्रखर सत्य आजचे समाजशास्त्रज्ञ कसे काय विसरताहेत .सर्व समाज घटकांचा विचार करणे गरजेचे आहे . देशभर छोट्या उद्योगांचे जाळे उभारण्याची गरज आहे .
लेख संग्रह : वर्तुळाचे टोक    
लेखक : सुहास सोहोनी ,अमरावती -६

No comments: