Friday, January 4, 2013

* मस्तवाल विकृतांध गुन्हेगारांना आवरा *

*  मस्तवाल विकृतांध गुन्हेगारांना आवरा  *
                         प्रत्येक स्त्री पुरुषांच्या मनात सुष्ट आणि दुष्ट असे दोन्ही विचार -तरंग उपजतच असतात .जन्मभर या दोन्ही परस्पर विरोधी विचारांच्या द्वंद्वात मानवी मन हेलाकावे खात असतं .सुविचार -कुविचार ,नीती-अनीती ,विघातक -विधायक ,सत्वगुण -तमोगुण किंवा चांगलं व वाईट या दोघांच्या मध्ये असतं संयमाचे कुंपण ,पण हे कुंपण लवचिक असल्यामुळे ज्या प्रकारच्या विचार तरंगांचे प्राबल्य वाढेल त्याची मनावर व्याप्ती वाढून दुसऱ्या प्रकारचा विचार प्रवाह निर्बल ,निस्तेज होतो .त्यानंतर आपसूकच चांगले किंवा वाईट कृत्य हातून घडते .सर्वांना समजेल अशा सोप्या पद्धतीने विचार करावयाचा झाला तर या संयमरूपी कुंपणाची बांधणी मजबूत बांधायला हवी .सुविचारांच्या वाढीमुळे समाजाचे आरोग्य सुधारून हवी तशी सुयोग्य प्रगती प्राप्त होते ,मात्र कुविचारी दुर्वर्तनाने समाजात अस्वस्थता ,असुरक्षितता वाढून स्वतःबरोबर अनेकांचे जीवन उध्वस्त होते .
                           ज्याप्रमाणे एखाद्या पिसाळलेल्या हिंस्त्र श्वापदाचा गावकर्यांना धोका असतो त्यापेक्षा जास्त धोका धोकदायक हे हिंसक ,उद्दाम ,उद्दंड ,मस्तवाल ,गुन्हेगारी प्रवृत्तीचे विकृतांध असतात .गरीब ,श्रीमंत व कोणत्याही वयाचे असलेले हे राक्षसी दुराचारी आपल्या इच्छाप्राप्तीसाठी कुठलाही विधिनिषेध बाळगत नाहीत .या विकृत पिसाटांना अत्याचारग्रस्त जीवाचे कुठलेही सोयरसुतक नसते .जिवंतपणी पदोपदी मरण यातना भोगण्याच प्राक्तन किंवा आत्महत्या या निरपराध जीवांच्या वाट्याला येते .का ?आणि हे पिसाट मस्तवाल कायद्याच्या पळवाटा शोधून उद्दामपणे वावरतात ,पुन्हा कित्येकांचे जीवन उध्वस्त करतात .दहशतवादी वा भ्रष्टाचारी वर्गाप्रमाणेच हे विकृत ,दुराचारी गुन्हेगार समाजाला भरपूर त्रास देतात ,आतांकित करतात .
                          संयमाचे बांध फोडून विकृती कां वाढते ? बालवयात बिम्बवलेल्या त्या सुसंस्काराच काय झालं ?कां बरे कमी पडले संस्कार ?व्यस्ततेमुळे आईवडिलांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळच नव्हता कां?आधुनिकतेची धुंदी चढल्यामुळे पारंपारिक संस्कार ,यमनियम ह्या मौल्यवान मूल्यांना पायदळी तुडवले गेले .आपल्या इच्छा ,लालसा व पैशांचा हव्यास पूर्ण करतांना सर्व नितीनियमांना  दूर सारले गेले ,सत
 विचारांची नित्य टिंगल टवाळी आणि भ्रष्टाचारामुळे अकारण आलेल्या श्रीमंतीत कसे घडावे संस्कार क्षम
मन !लायकीपेक्षा जास्त मिळालेलं धन नेहमीच चुकीच्या दिशेने वळायला खुणावत ,व्यसनाधीनता वाढवून विकृत इच्छा पूर्ण करण्याची जिद्द वाढवत आणि परिणामाची पर्व न करता इच्छा प्राप्तीच्या मार्गावर पाऊल पडते .समाजात उजळ माथ्याने वावरत असलेल्या या विकृतांधांवर जरब हवी .या गुन्हेगारांना कठोर शिक्षा हवी ,त्याचबरोबर आजच्या बालकांना सुसंस्कार मिळतील हि व्यवस्था हवी .म्हणजे भविष्यात असे विकृत निर्माण होणार नाहीत .या मस्तवाल विकृतांध गुन्हेगारांना आवरा .
                          सुहास सोहोनी
                        www.suhassooni.blogspot.com
                        www.mazyasamvedana.com






 

No comments: